देगलूर/प्रतिनिधी
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि हिंदू संघर्ष योद्धा पवन कल्याण यांच्या उपस्थितीत देगलूर येथे महायुतीची भव्य प्रचारसभा आयोजित करण्यात आली. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले), जनसुराज्य, रयत क्रांती, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, लहुजी शक्ती सेना या पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर (देगलूर-बिलोली विधानसभा) आणि संतुकराव मारोतराव हंबर्डे (नांदेड लोकसभा) यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.
सभेची सुरुवात जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी झाली. पवन कल्याण यांनी मराठी भाषेचा सन्मान करत महाराष्ट्राच्या वारसा आणि पंढरपूर वारी परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर महायुती नेत्यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. ११००० कि.मी. चा समृद्धी महामार्ग, राम मंदिराचे निर्माण आणि विविध विकासकामांमुळे भारताची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत वन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे.”
पवन कल्याण यांनी हिंदू समाजाच्या एकतेचे आवाहन करत सांगितले की, “मतभेद विसरून महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे आणि धर्म व राष्ट्राच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा.”
सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही उपस्थितांना संबोधित करत जितेश अंतापूरकर व संतुकराव हंबर्डे यांच्या विजयाची गरज स्पष्ट केली.
या सभेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, एस. पी. पाटील, वीरुपाक्ष महाराज, प्रशांत दासरवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
संपूर्ण सभा महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचंड उत्साहवर्धक ठरली असून आगामी निवडणुकीसाठी एकजूटता दाखवण्याचे आवाहन करण्यात आले.
