नांदेड/प्रतिनिधी
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर रोजी असल्याने सहा डिसेंबरच्या पूर्व संध्येला म्हणजेच पाच डिसेंबर रोजी होणारा महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ शपथविधी पुढे ढकलावा अशी मागणी आंबेडकरी अनुयायी महेंद्र गायकवाड यांनी एका ई निवेदना द्वारे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासहित अनेक मान्यवराकडे केली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महपरिनिर्वाण सहा डिसेंबर रोजी असल्याने भारतासह जगभरातील बहुजन, दलित समाज विशेषत: आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी चैत्यभूमी मुंबई येथे येतात. त्यामुळे दिनांक चार डिसेंबर पासून मुंबईत बहुजन समाजातील जनता व आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात येतात. सहा डिसेंबर हा दिवस सर्व जनतेसाठी दुःखाचा अर्थातच काळा दिवस आहे. यातच महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी पाच डिसेंबर रोजी मुंबईत होणार हे जाहीर करण्यात आले असून त्या दिवशी शपथविधी नंतर सगळीकडे जल्लोष साजरा होईल. तर एकीकडे बौद्ध, आंबेडकरी अनुयायी,बहुजन, दलित शोकात असतो आणि दुसरीकडे नवीन सरकार स्थापनेचा जल्लोष त्यामुळे समाजासमाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाच व सहा तारखेला नवीन सरकार स्थापनेचा जल्लोष राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करणार त्यामुळे या दिवशी कोणतेही गालबोट लागू नये हि संवेदनशील बाब व आंबेडकरी अनुयायांची भावना लक्षात घेता मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा तूर्तास पुढे ढकलून सामाजिक सलोखा अबाधित ठेवावा अशी मागणी आंबेडकरी अनुयायी महेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे ई. निवेदनाद्वारे केली आहे.
