देगलूर/प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील कावळगड्डा येथील ग्रामसेविका नीता माने यांच्या भ्रष्टाचार, जातीयवाद, गटबाजी व एकाधिकारशाही कारभाराच्या विरोधात ग्रामपंचायतमधील चार सदस्यांनी बंड पुकारले असून त्यांनी थेट सदस्यपदाचे राजीनामे गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जाधव पाटील (शिवसेना शाखाप्रमुख), विना व्यंकट जाधव, शोभा मारोतराव गायकवाड, आणि गौतम गंगाराम भालेमारे या चौघांनी २६ जून रोजी आपले सदस्यपद सोडत ग्रामसेविका नीता माने यांच्याविरुद्ध देगलूर पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सरपंच प्रतिनिधी आकाश गजले आणि ग्रामस्थ योगेश पाटील हे देखील या आंदोलनात सहभागी असून माने यांची बदली रद्द करून त्यांची नियुक्ती त्वरित अन्य ठिकाणी करावी, तसेच त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत सदस्यांच्या आरोपानुसार, ग्रामसेविका नीता माने यांनी मागील काळात राजकीय गटाच्या मदतीने गावात शांततेऐवजी तेढ निर्माण केली असून, बनावट विकासकामे दाखवून अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, शहर प्रमुख संजय जोशी, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला आहे.
प्रशासनाने लवकर निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
